चिखली रस्त्याचे डांबरीकरण पूर्ण करा अन्यथा गावकऱ्यांसह ठिय्या आंदोलन करणार.
सरपंच अढाव व उपसरपंच बर्डे यांचा इशारा

चिखली रस्त्याचे डांबरीकरण पूर्ण करा अन्यथा गावकऱ्यांसह ठिय्या आंदोलन करणार
सरपंच अढाव व उपसरपंच बर्डे यांचा इशारा
वाशीम: दि. २४) मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेअंतर्गत वाशीम – चिखली खुर्द ते आसोला फाटा ( शेलू बाजार रस्ता ) पर्यंतचे अर्धवट राहिलेले काम डांबरीकरण करून पूर्ण करण्याच्या दृष्टीने येत्या २९ एप्रील पर्यंत कामास प्रत्यक्ष सुरुवात न केल्यास येत्या ३० एप्रिल पासून गावकऱ्यांसह कार्यकारी अभियंता, मुख्यमंत्री ग्रामसडक योजना यांच्या कार्यालयात ठिय्या आंदोलन करणार असल्याचे गट ग्राम पंचायत चिखली खुर्द च्या सरपंच सौ. संध्या गणेशराव आढाव व उपसरपंच बाळूभाऊ बर्डे, संतोष सुर्वे यांनी ग्रामविकास मंत्री, पालकमंत्री वाशीम, प्रधान सचिव ग्रामविकास विभाग, अधीक्षक व कार्यकारी अभियंता मुख्यमंत्री ग्रामसडक योजना यांना जिल्हाधिकारी यांच्यामार्फत दिलेल्या निवेदन पत्राद्वारे म्हटले आहे.
निवेदनात पुढे म्हटले आहे की, मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेअंतर्गत वाशीम – चिखली खुर्द ते आसोला फाटा ( शेलुबाजार रस्ता ) हा अंदाजे 4.8 किमी रस्ता मंजूर करण्यात आला. सर्व तांत्रिक, प्रशासकीय बाबी पूर्ण करून अंदाजे दीड वर्षांपूर्वी रस्त्याच्या कामाला प्रत्यक्षात सुरुवात करण्यात आली. त्यानुसार काही दिवसातच स्क्रपिंग करून बिबिएम् चे दोन थर टाकण्यात आले. कच्चा रस्ता तयार झाला. परंतु सिलकोट व त्यावर कार्पेट / डांबर टाकण्याचेच काम शिल्लक आहे.
सद्यस्थितीत या रस्त्यावर जागोजागी खड्डे पडले असून रस्ता खूप खराब झालेला आहे. अनेक वाहने खिळखिळी होऊन खराब होत आहेत. शिवाय शारीरिक इजा, मणक्याचे आजार उफाळत असून ज्येष्ठ नागरिकांना, शाळेतील विद्यार्थ्यांना खूप त्रास होत आहे. सबब आता या रस्त्याचे उर्वरित काम होणे अत्यंत आवश्यक बनले आहे.
आम्ही ग्राम पंचायत व सामाजिक संघटना पदाधिकारी म्हणून वेळोवेळी संबंधित कंत्राटदार, अधिकारी यांच्याशी फोनवरून, प्रत्यक्ष भेटून संपर्क केला असता निधी नसल्यामुळे काम बंद असल्याचे सांगण्यात येते. मा. आमदार महोदय हे सुद्धा याबाबतीत संबंधित सर्वांशी दोन वेळा बोलले परंतु कामाला सुरुवात होत नाही आहे.
जर हा उन्हाळा निघून गेला तर पुढे सहा ( ६ ) महिने काम करता येणार नाही. पर्यायाने दरम्यानच्या काळात हा रस्ता पूर्वीपेक्षाही खराब होईल. परिणामी नागरिकांना दळनवळनास फार त्रास होणार आहे.
करिता सदर रस्त्याचे जवळपास 30 टक्केच राहिलेले काम पूर्ण करण्याच्या दृष्टीने येत्या २९ एप्रिल पर्यंत सुरुवात करण्यासाठी योग्य ते निर्देश द्यावेत, प्रयत्न करावे अन्यथा दिनांक ३० एप्रिल पासून आम्ही चिखली खुर्द, कामठवाडा, वाघजाळी, सुराळा, आसोला जहाँ., गोंडेगाव येथील महिला, विद्यार्थी, पुरुष दररोज सकाळी १० ते सायंकाळी ६ वाजेपर्यंत कार्यकारी अभियंता, मुख्यमंत्री ग्रामसडक योजना कार्यालय, वाशीम येथे मागणी पूर्ण होईपर्यंत ठिय्या आंदोलन करू. कायदा व सुव्यवस्थेची स्थिती उद्भवल्यास अथवा काही अनुचित प्रकार घडल्यास संबंधित विभाग जबाबदार राहील.